शिंदे गटात भूकंप; करमाळ्यातून ५५ पदाधिकाऱ्यांसह २० हजार सभासदांच्या सामूहिक राजीनाम्याने खळबळ!

15 Nov 2025 20:01:53
 
Eknath shinde
 Image Source:(Internet)
मुंबई :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी युतीचे तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत असतानाच, शिवसेना शिंदे (Shinde) गटात मोठा विस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती होताच, पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त करत थेट सामूहिक राजीनामे दिले आहेत.
 
बागल गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सोडत अधिकृत राजीनामे सादर केले. याशिवाय त्यांच्या गटाशी संबंधित २० हजार नोंदणीकृत सभासददेखील पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. हे सभासद आपले राजीनामे पोस्टाद्वारे पक्ष नेतृत्वाला पाठवणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
या घडामोडीमुळे करमाळा शहरातील शिंदे गटाची संघटनशक्ती मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
 
दिग्विजय बागल यांनी यापूर्वी करमाळा विधानसभा निवडणूक शिंदे गटाच्या तिकिटावर लढवली होती. त्यामुळं त्यांचा समर्थक वर्ग संघटनात प्रभावी मानला जातो. मात्र, जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच सामूहिक राजीनाम्यांचं नाट्य उफाळून आलं आहे.
 
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, पुढील दिवसांत करमाळ्यातील राजकीय समिकरणे आणखी बदलू शकतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0