Image Source:(Internet)
पटना :
२०२५ च्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकांत सुरुवातीच्या निकालांनी राज्याचे राजकीय चित्रच पालटले आहे. या वेळी जनता दल युनायटेड (जेडीयू) प्रचंड झेप घेत एनडीएचा सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, तर महाआघाडीतील आरजेडी आणि काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार एनडीएने १५०+ जागांची आघाडी घेतली असून बहुमताचा टप्पा सहज ओलांडला आहे. भाजपचे स्थिर प्रदर्शन आणि जेडीयूची पुनर्बांधणी यामुळे एनडीएचे सरकार जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
जेडीयूने या निवडणुकीत जबरदस्त पुनरागमन केले आहे. २०२० मध्ये केवळ ४३ जागांवर थांबलेले नितीश कुमार यांचे पक्ष यंदा ७५–८५ जागांकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएतील प्रमुख नेता म्हणून पुढे आले आहेत.
महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा तेजस्वी यादव यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. आरजेडी ३५–४५ जागांवर संघर्ष करत आहे. २०२० मधील ७५ जागांच्या तुलनेत ही कामगिरी फारच खराब मानली जात आहे.
काँग्रेसचा निकाल सर्वात निराशाजनक ठरला आहे. सुमारे ६१ जागांवर लढवूनही पक्ष ५–१० जागांच्या आसपास फिरत आहे. महाआघाडीचा सगळ्यात कमजोर दुवा म्हणून काँग्रेसची ओळख अधिकच पक्की झाली आहे.
एकूणच, बिहारमध्ये या वेळी जनतेने स्पष्टपणे एनडीएच्या बाजूने झुकलेला जनादेश दिल्याचे चित्र दिसत आहे. जेडीयूच्या जोरदार पुनरागमनामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेत निर्णायक भूमिका बजावणार हे निश्चित आहे.