विखे पाटलांच्या गाडीवर दगड मारणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस;बच्चू कडूंचा संताप

10 Nov 2025 13:18:29
 
Bachchu Kadu and Vikhe Patil
 Image Source:(Internet)
अमरावती :
राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू भडकले आहेत.
 
कडू यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटलं, “जो कोणी विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला मी स्वतः एक लाख रुपये बक्षीस देईन. त्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, आणि मी त्यांच्या गाडीसमोर आलो, तर ती मी स्वतः फोडीन.”
 
कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री कर्जमाफीची गप्पा मारतात, पण त्यांच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान होतोय. हे असह्य आहे. सरकारने लगेच विखे पाटलांवर कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष वाढेल.”
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी विधान केलं होतं की, “काही शेतकरी जाणूनबुजून कर्ज घेतात, कारण त्यांना वाटतं की सरकार माफ करेल.” या विधानाने राज्यभरातील शेतकऱ्यांचा आणि विरोधकांचा रोष उफाळला आहे.
 
कडू यांच्या आक्रमक वक्तव्यानंतर राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Powered By Sangraha 9.0