देशभर रेड अलर्ट, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

25 Oct 2025 22:44:29
 
Heavy rain
 Image Source:(Internet)
मुंबई:
पावसाने काही दिवसांसाठी विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा देशभर आणि महाराष्ट्रात (Maharashtra) अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. केरळ, तामिळनाडूसह संपूर्ण दक्षिण भारतात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असून, राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सोलापूरसह काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दुसरीकडे अरबी समुद्रात वादळासारखे वातावरण तयार झाले असून, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात मच्छिमारीसाठी न जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानिमित्त शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यात स्थानिक तसेच गुजरात, रत्नागिरी, मालवण आणि वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस वादळासारखे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. नगरातील प्रमुख भागांत काही प्रमाणात पाणी साचले होते. तथापि, मध्यरात्री पावसाने काहीसा थांबल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला.
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी आहे. सोलापूर शहरातील पूर्व भाग, अवंती नगर, वसंत विहार, जुळे सोलापूर आणि नई जिंदगी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने शहराची परिस्थिती प्रभावित केली आहे.
Powered By Sangraha 9.0