हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद

    29-Aug-2024
Total Views |

hockey major dhyan chand (Image Source : Internet)
 
 
आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचा गौरव म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण केले जाते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी खेलरत्न पुरस्काराला देखील मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची घोषणा करून त्यांच्या कार्याचा यथोचित असा गौरव केला आहे. ज्या खेळाडूंनी वर्षभर सर्वोत्तम कामगिरी करून जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे अशा खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.
 
आजच्याच दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सोमेश्वर दत्त हे आर्मीमध्ये असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर १९२२ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ते स्वतः आर्मीत दाखल झाले. त्यावेळी ते आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यात खेळत असे. हॉकीतील त्यांचे कौशल्य पाहून मेजर बाले तिवारी यांनी त्यांना हॉकीमधील बारकावे शिकवले. ते त्यांचे हॉकीमधील गुरू होते. पुढे मेजर ध्यानचंद हॉकीमध्ये इतके रमले की हॉकी हाच त्यांचा जीव की प्राण ठरला.
 
१९२२ ते १९२६ या कालावधीत त्यांनी रेजिमेंटच्या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले. हॉकीतील त्यांच्या कर्तुत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मी संघात त्यांची निवड झाली. हा दौरा त्यांनी गाजवला. या दौऱ्यात त्यांनी आपल्या संघाला १८ विजय मिळवून दिले. दोन लढती बरोबरीत सुटल्या तर केवळ एका लढतीत पराभव स्वीकारला. हा दौरा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या दौऱ्याने त्यांना जगभर नाव मिळवून दिले. या दौऱ्यानंतर त्यांना लान्स नायक म्हणून बढती मिळाली. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले.
 
मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळण्याचे कौशल्य अफलातून होते. चेंडूवरचे नियंत्रण ही त्यांची खासियत होती. चेंडू त्यांच्या ताब्यात असताना, मैदानात कोणी खेळत नाही असेच वाटायचे. चेंडू त्यांच्या स्टीक जवळून हलतच नसे म्हणून त्यांच्या स्टिकमध्ये चुंबक बसवला आहे अशी अफवा तेंव्हा पसरली होती. हॉकी हा सांघिक खेळ आहे तो संघ भावनेनेच खेळला पाहिजे असे त्यांचे मत होते म्हणूनच चेंडूवर अफलातून नियंत्रण असूनही ते आपल्या सहकाऱ्यांना अचूक पास द्यायचे. हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई खेळाने देशाला १९२८ (एमस्टरडॅम) १९३१ (लॉस अँजेलीस) १९३६ (बर्लिन) अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले होते.
 
१९३६ मधील भारत जर्मनी यांच्यात झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांनी एकहाती विजय मिळवून दिला होता. ही लढत पाहायला जर्मनीचे हुकूमशहा एडॉल्फ हिटलर उपस्थित होते. ध्यानचंद यांच्या खेळाने ते चांगलेच प्रभावित झाले. ध्यानचंद यांच्या हॉकीतील कौशल्याने जर्मनीचा हुकूमशहा एडॉल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ऑफर दिली होती; पण देशप्रेमी आणि स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. लॉस अँजेलीस मध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे वर्णन एका अमेरिकन पत्रकाराने पूर्वेकडील वादळ असे केले होते.
 
ध्यानचंद १९५६ मध्ये निवृत्त झाले. त्याचवर्षी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले. निवृत्तीनंतर पटियाला येथील क्रीडा संस्थेत मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी तरुण खेळाडूंना प्रशिक्षण दिले. ३ डिसेंबर १९७९ रोजी या महान खेळाडूचे निधन झाले. भारताला सुवर्णयुगाची अनुभूती देणाऱ्या या महान हॉकीच्या जादूगाराला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवावे अशीच तमाम भारतीय क्रीडा रसिकांची इच्छा आहे.
 
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.