देवेंद्र फडणवीसांमुळे महाराष्ट्रात ‘डर्टी पॉलिटिक्स’ वाढले; संजय राऊत यांची टीका

25 Jul 2024 11:53:08

Sanjay Raut criticizes DCM Devendra Fadnavis
(Image Source : Internet) 
 
मुंबई :
अंधश्रद्धा नर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
 
महाराष्ट्रात राजकारणाचं अधःपतन कुणी केलं असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. लोकांचे फोन टॅप करा, क्लिप्स बनवा. अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, क्लिप्स तयार केल्या. मला तर वाटतं की मोदी ज्याप्रमाणे नॉन बायलॉजिकल पंतप्रधान आहेत तसंच महाराष्ट्राला नॉन बायलॉजिकल गृहमंत्री मिळाला आहे. या भूमीवरचा माणूस नाही वरुनच पडला आहे हा माणूस. या राज्याच्या राजकाणाची प्रतिष्ठा ठेवणार की नाही? या महाराष्ट्रात अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स हे गेल्या पाच ते दहा वर्षांत वाढलं आहे. देशात मोदी आणि शाह आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून हे वाढलं आहे. डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं राजकारण हे सुरु झालं आहे,असा घणाघात राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केला.
Powered By Sangraha 9.0