(Image Source : Internet)
मुंबई :
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या निवडणुकीच्या तोंडावर ॲक्शन मोडवर आले आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो यासाठीच घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षासोबत
युती करायची का? कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू. मनसेची सत्ता आली पाहिजे यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.
लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
तसेच आज कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकिट पक्कं असे समजू नका. कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका. तससेच मला काही जणांनी सांगितलं की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे. त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे,असे राज ठाकरे म्हणाले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरु करतो आहे. जिल्हा, तालुक्यात येईन तेव्हा मी तुम्हाला भेटेनेच. मेळावे घ्यायचे की नाही ते नंतर पाहू. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका मी घेणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.