...तेव्हा त्यांना आरोपी का केले नाही; बावनकुळे यांचा प्रतिप्रश्न

    25-Jul-2024
Total Views |
Chandrasekhar Bawankule attacked the opponents
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला तेव्हाच गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एफआयआर दाखल करून त्यांना आरोपी का केले नाही, असा प्रतिप्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी खोटा नॅरेटिव्ह पसरविणे व समजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.
 
नवी दिल्लीतून नागपुरात परतल्यावर ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. गृहमंत्र्यांवर कुणी दबाव टाकू शकत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, दोन-अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला असे सांगणे हे तत्कालीन गृहमंत्र्याचे खोटेच आहे. तत्कालीन गृहमंत्री एवढे हतबल असू शकतात? अशा कपोलकल्पित बातम्या तयार करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असल्यास त्यांचे सर्व भष्ट्राचार बाहेर काढतात म्हणून त्यांना थांबविण्यासाठी समाजा-समाजात विभागणी करून महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचे काम इंडिया आघाडी करीत आहे.
 
६८ लोकांची विखारी टीम
 
एकटे श्याम मानव नाहीत, अशा ६८ लोकांची विखारी टीम मविआने तयार केली आहे. सामाजिक आरोग्य बिघडवून समाजात वाद निर्माण करण्यासाठी वेळवेगळी सेंटर्स निर्माण केली आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहूर करू असेही बावनकुळे म्हणाले.
 
पटापट काम, विरोधक पिसाळले
 
कॉंग्रेसने खटाखट पैसा देण्याचे आश्वासन दिले, मात्र महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पटापट काम करीत असल्याचे दाखवून दिल्याने विरोधक पिसाळले आहेत.
 
नुकसानीचा आढावा घेणार
 
विदर्भात आणि नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी नागपूर जिल्ह्यात दौरा आहे. पुण्यात पावसाने झालेल्या परिस्थितीवर अजित पवारांचे लक्ष असून मी देखील त्यांच्याशी बोलणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.