नागपूर :
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून भोले पेट्रोल पंप ते रवी नगर चौकादरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम सुरू झाले तेव्हापासून या मार्गावरील डाव्या बाजूचे पथदिवे बंद आहेत. रात्रीचा अंधार आणि पावसामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गेल्या काही महिन्यापासून रवी नगर चौक ते बोले पेट्रोल पंप या मार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. तेव्हापासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अशातच नागपुरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होत आहे व ते अंधारात न दिसल्यामुळे अपघातांची शक्यता खूप बळावली आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणजे जे उड्डाण पुलाचे पिलर्स बांधले आहेत त्यावर दिवे लावावे. त्यामुळे अंधारामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांना दिलासा मिळेल. प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची मागणी आहे, असे सामाजिक कार्यकर्ता संजय डब्ली यांनी सांगितले.