दर्यापूर :
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असून यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहे. तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यांचा शिवसेना(उबाठा) गटाने निषेध करीत दर्यापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली.
देशात एनडीएचे सरकार स्थापन होताच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून गेल्या एक महिन्यात भारतीय लष्करच नव्हे तर यात्रेकरूंना त्यांनी लक्ष करीत हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले असून यात्रेकरूंना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी दर्यापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करीत घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने योग्य त्या उपाययोजना करून दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर देत त्यांच्या कारवाया मोडून काढाव्या आणि दहशतवाद्यांचा नायनाट करून देशाचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केली.
या निदर्शने आंदोलनामध्ये अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे व दर्यापूर तालुकाप्रमुख सुनील पाटील डिके, अंजनगाव सुर्जी तालुका प्रमुख कपिल देशमुख, सहकार सेना तालुका प्रमुख गणेशराव लाजुरकर, तालुका समन्वयक सतिश काळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.