(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी परीक्षेशी (NEET UG exam) संबंधित 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी सुरू केली आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेचे आयोजन करण्याची अटही घातली आहे, नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारण हवीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी पारडीवाला, आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने पाटणा एम्समधल्या 4 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचे आदेश देऊ शकत नाही कारण 23 लाखांपैकी केवळ एक लाखांनाच प्रवेश मिळेल. संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला आहे, या भक्कम आधारावर फेरपरीक्षा घेण्यात यावी. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील नरेंद्र हुडा यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, हे सिद्ध केले पाहिजे की पेपर लीक इतका पद्धतशीर होता की त्याचा परिणाम संपूर्ण परीक्षेवर झाला.
अहवाल आज बंद लिफाफ्यात सादर
मिळालेल्या माहितीनुसार, पेपर लिक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशी चा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयने म्हटले आहे. अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.