बुलडाणा :
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 15 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. दुधा, ब्रह्मपुरी, पाचला, रायपूर येथील शेतकऱ्यांना दुधा ब्रह्मपुरी येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात नुकसान भरपाईचे 5 कोटी 40 लाख रुपये वितरीत करण्यात आले. यावेळी आमदार संजय रायमूलकर, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, कार्यकारी अभियंता अ. भा. चोपडे, खडकपूर्णाचे अधीक्षक अभियंता बा. ज. गाडे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे उपस्थित होते.
जाधव यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकोपयोगी निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना, शेतीची वीजबिल माफी, एक रुपयात पिकविमा, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, तीन गॅस सिलेंडर मोफत आदी निर्णय घेतले असल्याचे सांगितले. पेनटाकळी प्रकल्पाच्या कालवा पाझरामुळे नुकसान झाले. ही भरपाई मंजूर करून घेण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असल्याचे सांगितले. सिद्धेश्वर पवार यांनी सूत्रसंचालन केले.