एबी न्यूज नेटवर्क :
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी शुक्रवार 7 जून अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कोकण पदवीधर मतदारसंघातून सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करणाऱ्या मनसेने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी शुक्रवारी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली.
निर्णयाबाबत माहिती देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील, असे ठरले आहे. देवेंद्र फडणवीस, हे राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा ते दोनवेळा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.