मुंबई :
राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता या दुष्काळाने होरपळून निघाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहेत तर जनावरांना चारा नाही. महाभ्रष्टयुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली.जनतेने काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास दाखवलेला आहे. दुष्काळाने संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी सरकार उभे राहत नाही असे चित्र आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल.दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडेही मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, त्यासाठी खासदारांनी आपल्या मतदारसंघात दुष्काळी भागाचा दौरा करून आढावा घ्यावा. दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना आधार द्यावा तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पटोले म्हणाले.