भाजपच्या तानाशाही सरकारला जनता कंटाळली होती; नाना पटोलेंचे टीकास्त्र

07 Jun 2024 17:15:33

Nana Patole weighed in Tilak Bhavan
 
 
मुंबई :
भाजपच्या तानाशाही सरकारला जनता कंटाळली होती. लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत १० वर्ष अत्याचारी सरकार चालवले याचा जनतेत मोठा राग होता म्हणूनच जनतेने काँग्रेस इंडिया आघाडीला मोठा जनाधार दिला आहे, असे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
 
काँग्रेस पक्षाने राज्यात लोकसभेच्या १७ जागा लढवून १३ जागांवर दैदिप्यमान यश मिळवले आहे. काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडूतुला केली.
 
खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलले. या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते. जनतेने पदयात्रा व काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेस उमेदवारांना विजयी केले,असेही पटोले म्हणाले.
 
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष २०१९ च्या निवडणुकीत १ जागेवर विजयी झाला होता यावेळी २०२४ च्या निवडणुकीत १३ जागी विजय मिळवला आहे. या विजयात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत व परिश्रम यांचेही मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करून भाजपाप्रणित महायुती सरकारचा पराभव करेल, असेही पटोले म्हणाले.
Powered By Sangraha 9.0