नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान कार्यालयाला सेवा देणारी संस्था आणि लोकांचे पीएमओ बनवण्याचा सुरवातीपासूनच प्रयत्न असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले. "आम्ही पीएमओला उत्प्रेरक घटक म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जो नवीन ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत ठरतो," असे पंतप्रधानांनी उद्धृत केले.
सरकार म्हणजे शक्ती, समर्पण आणि संकल्पाची नवीन उर्जा असल्याचे नमूद करताना पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की समर्पित भावनेने जनसेवा करण्यासाठी पीएमओ आहे. केवळ मोदी सरकार चालवत नाहीत तर हजारो मनं एकत्र येऊन जबाबदारी पार पाडतात आणि परिणामी नागरिकच त्यांच्या कर्तृत्वाच्या भव्यतेचे साक्षीदार ठरतात असे त्यांनी अधोरेखित केले.
जे लोक त्यांच्या चमूमध्ये आहेत त्यांना वेळेचे बंधन, विचारांच्या मर्यादा किंवा प्रयत्नांसाठी कोणतेही मापदंड नाहीत हे अधोरेखित करून पंतप्रधान मोदी म्हणाले, "संपूर्ण देशाचा या चमूवर विश्वास आहे."
जे लोक त्यांच्या टीमचा भाग आहेत त्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी पुढील 5 वर्षांच्या विकसित भारतच्या प्रवासात सामील होऊ इच्छिणाऱ्यांना राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला झोकून देण्याचे आवाहन केले. "विकसित भारत 2047 च्या एका उद्देशाने आपण एकत्रितपणे ‘राष्ट्र प्रथम’ चे लक्ष्य साध्य करू," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की इच्छा आणि स्थैर्य एकत्रित आल्यानंतर निर्धार निर्माण होतो तर ज्यावेळी निर्धाराला कठोर परिश्रमाची जोड मिळते त्यावेळी यश प्राप्त होते. जर एखाद्याची इच्छा खंबीर असेल तर तिचे रुपांतर एका संकल्पात होते तर सतत इच्छेचे स्वरुप सतत बदलत राहिले तर ती केवळ एक लाट असते, असे ते म्हणाले.
देशाला नव्या शिखरावर नेण्याची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आणि गेल्या 10 वर्षात केलेल्या कामापेक्षा वरचढ कामगिरी करत नवा जागतिक मापदंड प्रस्थापित करण्याचे आवाहन आपल्या टीमला केले. आतापर्यंत कोणत्याही देशाने गाठले नसेल अशा शिखरावर आपल्या देशाला आपण नेलेच पाहिजे,असे पंतप्रधानांनी सांगितले.
विचारांमध्ये स्पष्टता,संकल्पावर विश्वास आणि कृती करण्याचा स्वभाव या यशासाठी आवश्यक बाबी आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. “आपल्याकडे या तीन गोष्टी असल्या तर अपयश आपल्या जवळपासही फिरकणार नाही, असे मला वाटते,” ते म्हणाले.
दृष्टीकोनाच्या दिशेने स्वतःला समर्पित करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी श्रेय दिले आणि म्हणाले की सरकारच्या कामगिरीमध्ये त्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. “या निवडणुकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांवर मान्यतेचे शिक्कामोर्तब केले आहे,” पंतप्रधान म्हणाले. नव्या संकल्पना विकसित करण्यासाठी आणि कामाच्या व्याप्तीत वाढ करण्यासाठी त्यांनी आपल्या टीमला प्रोत्साहित केले. त्यांच्या ऊर्जेच्या रहस्यावर प्रकाश टाकत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि जी व्यक्ती आपल्यातील विद्यार्थी जागृत राखते ती यशस्वी ठरते असे सांगितले.