त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मालाला नव्हे तर गद्दारांना भाव

    21-Apr-2024
Total Views |
- भाडोत्र्यांचा पक्ष संबोधून खा.संजय राऊत यांचा भाजपावर घणाघात
- चांदुर बाजार येथील जाहीर सभेत 'गो मोदी गो' चा नारा

MP Sanjay Raut attacked BJP

 
चांदुर बाजार :
कापूस, सोयाबीन, तूर या शेतमालाला भाव न देता गद्दार आमदार खासदारांना पन्नास खोके शंभर खोके देऊन भाजप हा भाडोत्र्यांचा पक्ष तसेच शेतकरी विरोधी पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा गाठून भाजपवाल्यांनी देशात हुकूमशाही आणली आहे, लोकशाही वाचविण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचावे लागेल यासाठी बळवंत वानखडे सारख्या प्रामाणिक उमेदवाराला दिल्लीत पाठवून अमरावतीच्या जनतेने दिल्लीतील सत्ता बदलाचे भागीदार व्हावे असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केले.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची मुलुखमैदानी तोफ खा. संजय राऊत यांच्या प्रचारसभेचे बुधवारी चांदुर बाजार येथे आयोजन करण्यात आले होते. खा. संजय राऊत यांनी बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकार यांनी देशाचे कसे वाटोळे केले याबाबत अनेक किस्से सांगितले.
 
मोदींच्या राज्यात शेतकरी नव्हे तर अडाणी, अंबानी व अमित शहाचे पुत्रच सुखी झाले, देशात सध्या गुलामगिरी सुरू असून लोकशाही वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन संविधानाचे रक्षण आपण केले पाहिजे कारण संविधान आपला प्राण आणि आत्मा आहे. यावेळी सभेत सुद्धा गो मोदी गो चा नारा गुंजला. दरम्यान अमरावतीचे राणा दाम्पत्य हे बंटी बबली आहे त्यांना ही उपाधी मीच दिली होती. त्यांच्याकडे देखील खूप मोठी पैश्याची ताकद आहे त्यांनी अमरावती सोबतच महाराष्ट्राचा देखील नावलौकिक आपल्या कुकृत्याने घालविला. अमरावतीकर जनता बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील व बबलीचे जप्त करेल असा मला ठाम विश्वास असल्याचे राऊत म्हणाले.
 
यावेळी आ. यशोमती ठाकूर,माजी खा.अनंत गुढे, संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी देखील आपले विचार व्यक्त करून नवनीत राणसह भाजप सरकारवर टीका केली. या निष्क्रिय सरकारला हद्दपार करून बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.