- अनैतिक संबंधातून घडली घटना
(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
एका तरुणाने प्रेयसी आणि तिच्या मुलाचा खून केल्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. ही थरार घटना एमआयडीसीच्या वानाडोंगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये सचिन राऊत (32) रा. भीमनगर, नाजनीन राऊत (30) रा. वैशालीनगर आणि 2 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि नाजनीन हे दोघेही विवाहित आहेत. सचिन ड्रायव्हरचे काम करतो. त्याचे नाजनीनसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. सचिनने तिच्यासाठी एमआयडीसीच्या वैशालीनगरात भाड्याने खोलीही घेतली होती. त्याचे नाजनीनच्या घरी रोज येणे-जाणे होते. दोघांमधील संबंधाची चाहूल त्यांच्या घरच्या लोकांनाही लागली होती. गत काही दिवसांपासून पैशांवरून सचिन आणि नाजनीनमध्ये वाद सुरू होता. शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सचिन, नाजनीन आणि तिच्या मुलाला वानाडोंगरीच्या गजानननगर येथील हॉटेल ‘गोल्डन की’मध्ये घेऊन गेला. हॉटेलच्या पहिल्या माळ्यावर खोली घेतली. सचिनने सायंकाळपर्यंत खोली सोडण्याचे हॉटेल व्यवस्थापनाला सांगितले होते. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सचिनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दारावरील व्हेंटीलेशनच्या खिडकीतून आत डोकावले असता सचिन पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
माहिती मिळताच डीसीपी जैन घटनास्थळी
तत्काळ घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते, मात्र जेव्हा दार उघडले तेव्हा नाजनीन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. जवळच तिचा मुलगाही मृतावस्थेत पडून होता. समोरचे दृष्य पाहताच पोलिसांनाही घाम फुटला. तत्काळ वरिष्ठांना माहिती देण्यात आली. झोन एकचे पोलिस उपायुक्त अनुराग जैन, एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. सचिनने आधी चिप्समधून विष देत नाजनीनच्या मुलाला मारले. त्यानंतर हातोडीने नाजनीनचे डोके आणि चेहऱ्यावर मारून खून केला आणि नंतर स्वत:ही पंख्याला गळफास लावत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. डीसीपी जैन यांनी सांगितले की, घटना अनैतिक संबंधातून घडली आहे. सचिनच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. मात्र सध्याच काहीही स्पष्टरित्या सांगता येत नाही.
लग्नसमारंभात झाली होती दोघांची ओळख
सुत्रांनुसार, तीन वर्षांपूर्वी सचिन एका लग्नानिमित्त मध्यप्रदेशला गेला होता. तेथे त्याची ओळख नाजनीन हिच्याशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तो नाजनीनला नागपुरात घेऊन आला. कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत समजल्यानंतर कौटुंबिक कलह सुरू झाले. सचिनने नाजनीनला भाड्याने खोली करून दिली. सांगण्यात येते की, सचिनला नाजनीनचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. सांगण्यात येते की, शुक्रवारीच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि कागदावर एक करारही बनवण्यात आला. त्यात मुलगा सचिनजवळच ठेवण्याची गोष्ट होती. मात्र शनिवारी कोणत्या गोष्टीवरून वाद झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यावरून सचिनने नाजनीनला संपविण्याची योजना आधीच बनवून ठेवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच तो होताडीही सोबत घेऊन आला होता. घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी फॉरेंसिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले आहेत.