चंद्रपूर :
जातीच्या भरवश्यावर, अश्रू ढाळून मते मिळत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छिते अश्रूना पुढे करून मी मते मागणार नाही. मी रडणारी नाही, लढणारी वाघीण आहे. बाळू भाऊंच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा मतदार संघ पोरका झाला होता. माझ्यावर, माझ्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दुःख बाजूला सारून मतदार संघ मी पिंजून काढला. अश्यात एखाद्यावेळी डोळे दाटून आले तर त्याचे ही तुम्ही भांडवल करता. तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली. एका विधवेच्या अश्रूचा तुम्ही अनादर केला. इथे बसलेल्या माझ्या माया, बहीणी तुम्हाला माफ करणार नाहीत, अशी गर्जना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. आज चंद्रपुरात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. पुढे प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्यात, अनिच्छेने एखाद्या नवरदेवाला लग्नाच्या मंडपात बसल्यावर ते लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो, अशा नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवार यांची झाली आहे. ही लढाई हुकूमशाही विरोधात लोकशाहीची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलू पाहणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.
मी जातीपातीच्या भरोशावर निवडणूक लढवत नाहीये कारण ज्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली तो पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे मी ज्या दिवशी तिकीट जाहीर केला त्या दिवशी देखील सांगितलं की राजा बोले आणि दाढी हाले त्या पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही. त्याच्यामुळे समाजाच्या भरोशावर किंवा समाजाचा राजकारण करून मी ही निवडणूक लढवत नाही तर हुकूमशाहीच्या विरुद्ध लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे म्हणून लोकशाही जर का बळकट करायची असेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही लढाई लढाई आहे. सुधीर भाऊंनी पालकमंत्री असताना विरोधी पक्षाचे आमदारांना एकही रुपये त्यांनी दिला नाही. माझ्यावरती टीका केल्या तरी ही कोणाच्या बापाला घाबरणारी नाही आहे मी आजच या ठिकाणी ठणकावून सांगितले.
या लढाईत प्रत्येकजण शूर शिपाई आहे. चंद्रपूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चंद्रपूर शहरातील कोहिनुर ग्राउंड येथून येथून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते, समर्थक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते प्रतिभाताई धानोरकर यांचा समर्थनार्थ घोषणा देत होते. चंद्रपूर, यवतमाळ जिल्हातून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक या सभेला आणि मिरवणुकीला हजर होते. रखरखीत उन्हात झालेल्या जाहीर सभा झाली. या सभेचे अध्यक्ष आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे होते. मंचावर उपस्थित माजीमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवडे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार देवराव भांडेकर, राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष (शरदचंद्र पवार गट), संदीप गिऱ्हे, शिवसेना जिल्हाध्यक्ष (उबाठा), सुनील मुसळे आम आदमी पार्टी (वरिष्ठ नेते), दिलीप चौधरी, अध्यक्ष (जिजाऊ ब्रिगेट), सोहेल शेख जिल्हाध्यक्ष (समाजवादी पार्टी ), प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), रमेशचंद्र दहिवडे जिल्हा सचिव (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), देवानंद पवार माजी सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांची उपस्थिती होती.
भावनिक आणि जातीय प्रचार करण्याचा विरोधकांनी जो प्रयत्न चालवला, त्याला यावेळी प्रतिभाताई धानोरकर यांनी सडेतोड उत्तर दिले. आता रडायचे नाही, तर लढायचे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.