(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. महायुतीतून भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यातच महायुतीमधील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे विधानसभा निवडणुकीसाठी जागांची मागणी करत आहेत. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षालादेखील निवडणुकीत काही जागा लढवायच्या आहेत. यासाठी ते महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भाष्य केले.
आम्ही पाच-सहा जागा मिळाव्यात असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मी अजित पवार यांना आज बोलले की, मला आपणाला भेटायचे आहे. अजित दादांनी सांगितलं की, मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसांत आपण तुमच्या जागांबद्दल फायनल करू. कोणती जागा आपल्याला सोडता येऊ शकते, यासाठी उद्या तीनही नेत्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न करतो.
महायुतीला अडचणीत आण्याची आमची भूमिका नाही. आम्ही सोजवळ आहोत. समंजस आहोत. आम्हाला महायुती सोबतच राहायचे आहे. पण म्हणून आम्हला एकदम दुर्लक्ष करू नये. एवढंच आमचं म्हणणं आहे. जागावाटपात आम्हाला न्याय मिळू शकेल. मुंबईमध्ये आम्ही धारावी आणि चेंबूरची जागा मागितली आहे. या दोन पैकी कोणती तरी एक जागा आम्हाला मिळावी.