- महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर
(image source: internet/representative)
नवी दिल्ली :
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा गुरुवारी रात्री उशीरा करण्यात आली. यावर्षी १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून गुरुवारी या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश
यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.
क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.
वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) नुकतेच जाहीर झाले आहे. या वर्षी एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 05 पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.
भारतरत्न नंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणार्याक पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी 2024 रोजी करण्यात आली. 1954 मध्ये स्थापन करण्यात आलेले, हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व्यक्तींना ओळखतात. पद्म पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केली जाते. यामध्ये कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध श्रेणींचा समावेश होतो.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, साहित्य-शिक्षण, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग-व्यापार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.
राज्यातील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये हॉर्मुसजी कामा, आश्वीन मेहता, राम नाईक, राजदत्त तथा दत्तात्रय मायाळू, प्यारेलाल शर्मा, कुंदन व्यास यांचा समावेश असून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उदय देशपांडे, वैद्यकीय क्षेत्रासाठी मनोहर डोळे व चंद्रशेखर मेश्राम, साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी जहीर काझी, उद्योग व व्यापार क्षेत्रासाठी कल्पना मोरपारिया आणि सामाजिक कार्यासाठी शंकर बाबा पापळकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. या सर्वांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले, महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. या सर्व विजेत्यांच्या कर्तृत्वाचा आज योग्य सन्मान झाला. कर्तृत्ववान माणसांमुळे कोणत्याही राज्याची ओळख होत असते. महाराष्ट्राने आजवर देशाला किर्तीवंत माणसं दिली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आज पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रत्येकाने आपले आयुष्य लोकहितासाठीसाठी समर्पित केलं आहे. वैद्यकीय, कला, साहित्य, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा आजचा सन्मान सर्वांना अभिमान वाटणारा आणि आनंद देणारा आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्ती प्रेरणास्रोत म्हणून यापुढेही जनतेची सेवा करतील याची मला खात्री आहे. त्यांचा आदर्श तरुण पिढी घेईल आणि राज्याचं नाव मोठं करेल, असा मला विश्वास आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.