(image source: internet/representative)
नागपूर:
नव्या वर्षाला सुरुवात होताच पहिला सण येतो तो मकर संक्रांतीचा. संपूर्ण देशभरात मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. मात्र, विविध राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. महाराष्ट्रातही मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. मुळात अशी मान्यता आहे की, पौष महिन्यात सूर्य धनु राशीतून बाहेर पडतो आणि मकर राशीत प्रवेश करतो, त्यादिवशी हा सण साजरा केला जातो. आणि म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. यावर्षी मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे महत्व आहे. परंतु यामागचे कारण खूप कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे काय महत्व आहे.
सहसा कुठल्या शुभ कार्य, शुभ दिनाच्या दिवशी किंवा पूजेत काळ्या रंगाचा उपयोग पूर्णपणे टाळला जातो. परंतु, मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. काळ्या रंगला नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तर दिशेकडे वळतो. त्यामुळे, या सणाला उत्तरायण देखील म्हटले जाते. असे मानले जाते की, या दिवसापासून हिवाळा संपूर्ण वसंत ऋतूला सुरुवात होते. भारतात प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला सण आणि उत्सव साजरे करण्यात येते.
दरम्यान, मकर संक्रातीच्या पूर्वीची रात्र ही संपूर्ण हिवाळ्यातील सर्वांत लांब आणि थंड असते. त्यामुळे, या लांब रात्रीच्या काळोख्याला निरोप देण्यासाठी काळे कपडे घातले जातात. तसेच, काळ्या रंगाचे कपडे बाहेरची उष्णता शोषून शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. हा सण साजरा करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, या संक्रांतीच्या सणापासून दिवस मोठा होत जातो. एकमेकांमध्ये असलेली वर्षभराची मतभेद, भांडणे, वाद-विवाद अशा सर्व कठोर भावना दूर करत हितसंबंध सुधारण्यासाठी 'तिळगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला' असे म्हणत सर्वांना संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटले जाते.
नवविवाहित वधूसाठी करतात 'तिळवा' :
महाराष्ट्रात नवविवाहित वधूसाठी संक्रांतीत तिळव्याचा कार्यक्रम ठेवला जातो. मात्र, याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात. भेट मिळालेली साडी आणि दागिने घालून नवविवाहित वधू तयार होते. त्यानंतर नववधूची ओटी भरली जाते. तसेच नवविवाहित वधू सलग पाच वर्षांपर्यंत वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे, कंगवा, आरसा, बांगड्या, काळे मणीसर, मेहंदी वाण म्हणून देते. त्यानंतर आपल्या आवडीनुसार कुठलीही वस्तू वाण म्हणून देता येते.