- आमदार मेघे व जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
नागपूर : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘माझी माती माझा देश’ अभियान देशात सर्वत्र साजरा होत आहे. हा उपक्रम 1 ते 15 या कालावधीत साजरा होत असून यामध्ये शिलाफलक, वसुधा पुजन, वीरांना वंदन, पंचप्रण शपथ, ध्वजारोहन अशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना लोकाभिमुख करुन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या सूचना आमदार समीर मेघे व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
नगर परिषद, वाडी येथे ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणा विधान सभेचे आमदार समीर मेघे, नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे, मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या माझी माती माझा देश अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन प्रतिसाद द्यावा, असे आमदार समीर मेघे यांनी सांगितले. 105 कोटीचा निधी भूमिगत गटार योजनेला दिल्यामुळे वाडी शहराची कायाच बदललेली असेल. या सोबत लवकरच वाडी शहरास मेट्रोने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण पिढी मोबाईलकडे वळलेली आहेत. त्यामुळे देशाचा इतिहासाबद्दल त्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने हे अभियान फलदायी ठरेल, असेही ते म्हणाले.
हर घर तिरंगा अंतर्गत स्वातंत्र्यदिनी आर्थिक दृष्टया गरीब लोकांना 50 हजार तिरंगे प्रशासनातर्फे वाटप करण्यात येणार असून नागरिकांनी मागील वर्षी लावण्यात आलेले तिरंगे स्वच्छ करुन पुन्हा आपल्या घरावर फडकावून उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
वाडी नगर परिषदेला भूमिगत गटार योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून त्यामुळे स्वच्छ व सुंदर शहर होणार आहे. त्याबरोबरच अत्याधूनिक स्मशानभूमीचे काम लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी शिलाफलकाचे अनावरण, शहिदांना पुष्पचक्र वाहण्यात आले. तसेच अमृत वाटिकेत वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली. सेल्फी पाइंटचा जिल्हाधिकारी,आमदार यांनी लाभ घेतला. नागरिकांनी आनंद घेतला. तसेच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी यांनी अभियानाची माहिती देवून वाडी शहरात स्वातंत्र्यदिनी 3 हजार तिरंगे फाडकविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.