- पालखी सोहळ्याचे हे 54 वे वर्ष
शेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी आज २६ मे रोजी संतनगरीतून पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार ज्येष्ठ शुध्द सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने आज सकाळी ७.३० वाजता प्रस्थान झाले.
आज सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी केली होती. सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात येते. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोते या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेषात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान केलं.
श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर पोहोचणार आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे..
ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर ६०० ते ७०० पताकाधारी वारकरी गण गण गणात बोतेचा नाम गजर करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत नगरीत दाखल होत असतात.