-सत्कर्माची आवड निर्माण व्हावी – ह.भ.प. अनंत महाराज पाखोडे
नागपूर:
श्रीगुरुमंदिर जयप्रकाश नगर येथे दत्तजयंती उत्सवाला भाविकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ह.भ.प.अनंत महाराज पाखोडे यांचे ‘ज्ञानेश्वरांचे पसायदान’ या विषयावर प्रवचन झाले. विश्वात्मक देव म्हणजे गुरु असे सांगताना त्यांनी पसायदानातल्या शब्दांमागील गूढ अर्थाची अतिशय सुंदर रीतीने उकल करून दाखवली. ते म्हणाले, वाईट प्रवृत्ती बदलावी यासाठी सर्व लोकांना सत्कर्माची आवड निर्माण होणे आवश्यक अहे. आपसात प्रेमभाव वाढला पाहिजे, रोज ही प्रार्थना करणे आवश्यक आहे.
सायंकाळच्या कीर्तन सत्रात ह.भ.प. शरदबुवा घाग यांनी पहिले पुष्प गुंफले. कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये त्यांनी प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचा ‘कोण या जगाचा करी परिपाळ’ हा अभंग घेतला. अभंगातील विविध दृष्टांत देऊन पहिल्या चरणाचे निरुपणात परमात्मा सर्वाचा क्षणोक्षणी सांभाळ करतो, हे त्यांनी सांगितले. उत्तरार्धात त्यांनी अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणेशाचे आख्यान घेतले. आख्यानात भगवान गोपाळकृष्णांच्या सदैव गोड अशा लीला वर्णन केल्या. संतांची पदे, गौळणी इत्यादी खड्या आणि तेवढ्याच कर्णमधून आवाजात कीर्तनात पेरून त्यांनी सर्वांना खिळवून ठेवले.
r