फेटरीतील डॉ. विजय पवार यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

13 Dec 2023 17:27:24
 
dr-vijay-pawar-media-analysis - Abhijeet Bharat
 
वाडी : माहिती घेण्याच्या व देण्याच्या अधिकारातील संघर्ष कमी करून वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचू शकेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लोकमत समूहाचे अध्यक्ष राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात फेटरी येथील पत्रकार डॉ. विजय पवार यांच्या 'प्रसारमाध्यमे कालची आणि आजची' तसेच 'विदर्भ आणि प्रसारमाध्यमे' या दोन पुस्तकांचे प्रकाशन विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभेचे विदर्भ अध्यक्ष अजय पाटील, वनराईचे सचिव निलेश खांडेकर, प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकृष्ण चांडक, रुपाली मोरे आदी उपस्थित होते.
 
आज वाचकापर्यंत नेमके सत्य पोहचवले जात आहे किंवा नाही याचा विचार फारसा होताना दिसत नाही. कोणती बातमी किंवा माहिती कशा पद्धतीने पेरली जाईल हे समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सत्य कसे मांडता येईल याचे मोठे आव्हान माध्यमांपुढे उभे ठाकले आहे, असे त्यांनी सांगितले.
 
समाजात आपल्या अवती भवती असलेल्या आदर्श प्रवृत्तींना दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते. त्याचे परिमार्जन होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून अशा आदर्श व्यक्तींनी केलेले कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचणे शक्य होईल असे प्रतिपादन श्रीपाद अपराजित यांनी केले. यावेळी त्यांनी विदर्भातील ऐतिहासिक प्रेरणास्थळांकडे झालेले दुर्लक्ष व त्याचा समृद्ध इतिहास कसा जपता येईल याविषयीची कळकळ व्यक्त केली. डॉ. विजय पवार यांनी त्यांच्या पुस्तकातून संशोधनाद्वारे आतापर्यंत मांडलेला इतिहास अत्यंत समृद्ध आणि सर्वसमावेशक आहे. या दोन्ही पुस्तकातून विविध प्रकारची प्रसारमाध्यमे व त्यात योगदान देणाऱ्यांची उत्तम दखल घेण्यात आल्याचे गौरवोद्गार अपराजित यांनी काढले.
 
डॉ. पवार यांनी दोन्ही पुस्तके लिहिण्यामागील भूमिका यावेळी मांडली. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील विशेषत: मराठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या दोन्ही पुस्तकांचे लिखाण करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातील प्रसारमाध्यमांचा इतिहास ते आतापर्यंतची पत्रकारिता असा आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी पत्रकारितेवरील या दोन्ही पुस्तकातून प्रसारमाध्यमांचा घेतलेला आढावा अत्यंत वाचनीय व उपयोगी आहे. यावेळी योग्य इतिहास पुढे आणण्यासाठी त्याचे डॉक्युमेंटशन होण्याची गरज गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार निलेश खांडेकर यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0