मुंबई : ज्येष्ठ चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचे वृत्त आहे. मात्र आता त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज संपली आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
जवळपास गेल्या ४५ वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत सक्रिय असलेल्या भैरवी वैद्य यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण केले होते. याशिवाय भैरवी वैद्य यांनी सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके, हमराझ, हेरा फेरी, व्हॉट्स योर राशी, क्या दिल ने कहा यासह अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. शेवटच्या त्या टीव्ही शो 'निमा डेन्झोंगपा'मध्ये दिसल्या होत्या. भैरवी वैद्य या त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.