(image source: screengrab/tw)
पुणे :
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून बुधवारी सकाळची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भीमा नदीत एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांना वाटले होते. मात्र हे हत्येचे प्रकरण असल्याचे धक्कादायक खुलासा करणारी माहिती बुधवारी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कुटुंबाची हत्या चुलत भावंडांनी केली असून या हत्याकांडाला त्यांनी आत्महत्येचा स्वरूप दिले आहे.
जवळपास एका आठवड्यापूर्वी पुण्यातील भीमा नदीमध्ये एका कुटुंबाच्या सात लोकांचे मृतदेह मिळाले होते. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी सांगितले होते की, पीडित कुटुंबातील मुलीचे गावातील एका मुलावर प्रेम होते. दोघेही प्रेमी गावातून फरार झाले होते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली.
मात्र, या प्रकरणी पुढे आणखी तपास केल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्येचे प्रकरण असल्याचे उघड झाले. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या तपासात या ७ लोकांचा मृत्यू आत्महत्येने नाही, तर हत्या केल्यामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब आणि चुलत भावंडांमधील द्वेषामुळे ही हत्या करण्यात आली आहे. कुटुंबातील सर्व ७ जणांची हत्या चुलत भावांनी केली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री हत्या करणाऱ्या चार चुलत भावांना अटक करण्यात आली आहे. या चार भावांबरोबर एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यातील परस्पर द्वेषामुळे या ७ जणांना त्यांच्याच नातेवाईकांनी आधी काहीतरी खाऊ घालून बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांना नदीत फेकून दिले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.