विश्वचषकासाठी संतुलित संघ निवड

    14-Sep-2022
Total Views |

team india (Image Source : Internet)
 
पुढील महिन्यात १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेपसाठी निवड समितीने सोमवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात रोहित शर्मा व के एल राहुल हे संघाचे कर्णधार व उपकर्णधार भारताच्या डावाची सुरुवात करतील. तर मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दीपक हुडा तसेच यष्टीरक्षक ऋषभ पंतवर टाकण्यात आली असून दिनेश कार्तिक हा एक आणखी अतिरिक्त यष्टीरक्षकाला संधी देण्यात आली आहे, ती त्याच्या फिनिशर या भूमिकेमुळे.
 
भारताची फलंदाजी अतिशय बलवान असून रोहित, राहुल व विराट हे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. विशेष म्हणजे तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आशिया चषकात तिघांनीही चांगली कामगीरी केली आहे. विराटने तर शतक झळकाववून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना इशारा दिला आहे. तो फॉर्मात आल्याने विश्वचषक जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर मिस्टर ३६० सुर्यकुमार यादव आहे. तो मैदानात सर्वत्र फटकेबाजी करू शकतो. भारताचा तो भरवशाचा फलंदाज मानला जातो. त्यानंतर ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक हे यष्टीरक्षक फलंदाज मैदानात येतील. दोघेही स्फोटक फलंदाज असून मॅच फिनिशर आहेत. कमी चेंडूत जास्त धावा काढून संघाला विजय मिळवून देण्यात दोघांचाही हातखंडा आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू येईल. तो गोलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो. त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत.
 
दीपक हुडा हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहे. मंदगती गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. गोलंदाजीमध्ये निवड समितीने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून अनुभवी रवीचंद्रन अश्विन सोबत टी २० स्पेशालिस्ट लेग स्पिनर यजुवेंद्र चहल आणि लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल यांना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजा जायबंदी झाल्याने अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. ऑफ स्पिनर, लेग स्पिनर आणि लेफ्ट आर्म स्पिनर अशा सर्वांना संधी देऊन गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे शिवाय अश्विन व अक्षर पटेल वेळप्रसंगी फलंदाजीही करतात. त्यांची फलंदाजी भारतासाठी बोनस ठरेल. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांसोबत हर्षल पटेल आणि अर्षदीप सिंग या युवा गोलंदाजांना देखील निवड समितीने संधी दिली आहे.
 
निवड समितीने मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजाकडे मात्र दुर्लक्ष केले याची खंत वाटते. कारण विश्वचषकासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा झाला असता. असो... निवड समितीने निवडलेला हा संघ देखील चांगला आहे. जुन्या आणि नव्या खेळाडूंना संधी देत जोश आणि होश यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला हा संघ संतुलित आहे, हे मान्य करून नीवड समितीचे याबाबत अभिनंदन करावे लागेल. आता जबाबदारी आहे ती निवडण्यात आलेल्या या १५ खेळाडूंची.
 
आशिया चषकात आलेले अपयश झटकून नव्याने सुरुवात करण्याची संधी या निमित्ताने या संघाला मिळणार आहे. सर्व खेळाडू अनुभवी आहेत. सर्व खेळाडू टी २० मध्ये माहीर आहेत. त्यामुळे संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला १५ वर्षांनंतर टी २० चा विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, अशी आशा करूया. भारतीय संघाला टी २० विश्वचषकासाठी मनापासून शुभेच्छा!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.