नियम पाळा अपघात टाळा!

    13-Sep-2022
Total Views |

stop accident(Image Source : Internet) 
 
 
मागील महिन्यात शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा समाजाचीच नव्हे तर राज्याची मोठी हानी झाली. त्यांच्या अपघाती निधनातून राज्य सावरत नाही तोच टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले.
 
सायरस मिस्त्री यांचा मागील रविवारी गुजरातच्या अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर चारोटी जवळ सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. सायरस मिस्त्री यांचे देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या निधनाने उद्योग विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. कोट्यवधी रुपयांची आलिशान मर्सिडीज गाडीसुद्धा सायरस मिस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जीव वाचवू शकली नाही. गाडी अतिशय वेगात असल्यानेच अपघात झाला, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. चौकशीतून अपघाताचे सत्य समोर येईल मात्र सायरस मिस्त्री, विनायक मेटे यांच्यासारख्या समाजातील महनीय व्यक्तींच्या अशा अकाली निधनाने समाजाचे मोठे नुकसान होत आहे.
 
विनायक मेटे, सायरस मिस्त्री हे समाजातील महनीय व्यक्ती आहेत, म्हणून त्यांच्या निधनाची बातमी होते. मात्र रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. देशात सर्वात जास्त मृत्यू अपघातात होतात. अपघातात जखमी आणि कायमचे जायबंदी होणाऱ्यांची संख्या तर अगणित आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचा समावेश अधिक आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत, त्याच तरुणांचे अपघातात निधन होत असेल तर ती देशाची मोठी हानी आहे. अनेक प्रयत्न करूनही देशातील रस्ते अपघातांची संख्या का कमी होत नाही हा संशोधनाचा विषय आहे. वाढत्या रस्ते अपघातांना जितकी व्यवस्था जबाबदार आहेत, तितकीच मानवी चुकाही जबाबदार आहेत.
 
टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात असतानाच महामार्गावर जीवघेण्या ब्लॅकस्पॉटमध्ये सुधारणा होत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, महामार्गावरील अतिक्रमणे, सर्व्हिस रोडचा अभाव, रस्त्यावरच उभी केली जाणारी अवजड वाहने, बंद पडलेल्या वाहनांसाठी कमी पडत असलेली मदत केंद्रे, मोकाट जनावरे, अपुरे दुभाजक याबाबी अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. महामार्गावर वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी १०० किमी पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात. ट्रक व इतर मोठ्या वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. काही वाहन चालक तर दारु पिऊन वाहने चालवतात, तर काही वाहन चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलतात. वाहनांची व्यवस्थित निगा न राखणे, सीट बेल्ट न लावणे या गोष्टीही अपघातास कारणीभूत ठरतात. नियम माहीत असूनही चालक त्यांचे पालन करत नाहीत. सगळ्यांनाच कमी वेळात आपले ठिकाण गाठायचे असते. नियमांचे पालन न केल्यानेच अपघातांची संख्या कमी होत नाही. अपघातांची संख्या कमी करायची असेल तर वाहन चालकांना नियमांचे पालन करावेच लागेल. नियम पाळा अपघात टाळा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.