पाऊले चालती पंढरीची वाट!

    05-Jul-2022
Total Views |
 

pandharpur wari 
 
 
नागपूर :
आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा उत्सव. भक्त आणि देव यांचा अनोखा मेळा म्हणजेच पंढरपूरची आषाढी एकादशीची भव्य यात्रा. अलंकापुरीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची, देहूनगरीतून जगद्गुरू तुकोबारायांची तर वेगवेगळ्या भागातून शेकडो संतांच्या लहानमोठ्या पालख्या टाळ-मृदंगांच्या निनादात हरिनामाचा गजर करीत पंढरीत अवतरतात आणि 'विठ्ठल-विठ्ठल'च्या नामघोषाने अवघी पंढरी दुमदुमते, भक्तिरसात चिंब होते.
 
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नसल्याने यंदा वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत. दरवर्षी लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात. अशा या निघणाऱ्या 'पंढरपूर वारी'ला जुनी परंपरा लाभलेली असून महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरपुरच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. विठ्ठलाला भेटण्यासाठी पद, पैसा या गोष्टी महत्वाच्या नसून फक्त अंतर्मनातील भाव महत्वाचा असतो.
 
यंदा आषाढी एकादशी रविवारी १० जुलै २०२२ रोजी येत आहे. विठुरायाला भेटायची आस आणि मुखी विठ्ठूल नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आषाढी एकादशी व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते, अशी आस्था आहे. आषाढी एकादशीचे उपवास केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते. वर्षभरात येणाऱ्या एकादशांमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशा महत्त्वाच्या मानल्या जातात. चातुर्मासात देव झोपलेले असल्यामुळे माणसाने स्वत:च्या संरक्षणासाठी या काळात व्रतं, उपवास, भजन-कीर्तन करण्याची पद्धत पाडली असावी. त्याचबरोबर या काळात पावसाळा असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेताने आहार घेणे केव्हाही उत्तमच. म्हणूनच पचायला जड असे पदार्थ टाळून उपवासाची परंपरा पडली असावी.
 
समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. वारीत विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होतात. या 'पंढरीच्या वारी' त सामील होणारे सगळे 'वारकरी' असतात. आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. सगळे वारकरी भेदभाव विसरुन वारीत सामील होतात. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. आषाढी एकादशीला महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. भक्तिरसात चिंब होतो. जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन जमलेली वैष्णवांची मांदियाळी आणि त्यांनी मारलेली 'माउली-माउली' ची हाक म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा विलोभनीय महासोहळाच. वर्षानुवर्षे अव्याहतपणे ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता सुरु असलेला आणि राज्यातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा बनलेला पंढरीतील पालखी सोहळा (वारी) यंदा साकारणार आहे. त्यामुळे यंदा वारीला जाता येणार नसल्याची हुरहूर वारकऱ्यांना लागणार नाही. गेली दोन वर्षे प्राप्त परिस्थिती स्वीकारून वारकऱ्यांनी मनानेच पंढरीची वारी केली आणि चंद्रभागेच्या तीराऐवजी मनगंगेच्या तीरावर विठुरायाच्या नामाचा गजर केला होता.
 
दरवर्षी वारी पाहण्यासाठी अनेक विदेशी नागरिक पंढरीची वारी करतात. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला सुमारे १० लाखांच्या घरातील हा शिस्तबद्ध सोहळा जगातील एक आश्चर्य असून या वारीचे व्यवस्थापन हा जगभरातील संशोधकांच्या अभ्यासाचा विषय ठरावा. आज समाजाला जातीयता, दांभिकता, अंधश्रद्धा, स्वार्थ आदींनी ग्रासल्याने ढासळत चाललेल्या समाजव्यवस्थेला संतविचारच तारू शकतील. त्यासाठी वारी हा प्रेरणास्त्रोत ठरू शकेल.
 

vijay koshti  
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.