(Image Source : Mahasamvad)
मुंबई :
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचे आज संपूर्ण देशभरात पुन्हा स्मरण केले जात आहे. याच दिवशी भारताच्या वीर सुपुत्रांनी दहशतवाद्यांशी लढत आपल्या प्राणाची आहुती दिली.
मुंबईवरील या २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली.
तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलिस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.
मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन संचलन कार्यक्रमास मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सर्वं उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.