थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

    23-Nov-2022
Total Views |
 
dr. jagdishchandra bose
 (Image Source : Internet)
  
थोर शास्त्रज्ञ डॉ. (सर) जगदीशचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन. डॉ. जगदीशचंद्र बोस हे भारताचे पहिले जीव शास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ होते. जगदीशचंद्र बोस यांनी, 'वनस्पतींमध्येही प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात' हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. 'उण, पाऊस, थंडी, प्रकाश, ध्वनी यांमुळे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींमध्येही संवेदना निर्माण होतात' हे सिद्ध करण्यासाठी,  त्यांनी सेस्कोग्राफ नावाचे यंत्र बनवले. या यंत्राने वनस्पतीची संवेदना दहा हजार पटीने मोठी करून बघता येणे शक्य झाले. सेस्कोग्राफ हे यंत्र वनस्पती शास्त्रासाठी वरदान ठरले.
 
जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बंगालमधील, (आताच्या बांगलादेशमधील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे वडील भगवानसिंग बोस हे सरकारी अधिकारी होते. लहानपणापासून जगदीशचंद्र बोस यांना आजूबाजूचा निसर्ग पाहायचे, त्याचे निरीक्षण करण्याची आवड होती. झाडे, फुले, पक्षी, प्राणी, फुलपाखरे पाहणे, हा त्यांचा आवडता छंद होता. जगदीशचंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेतच झाले. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेव्हीयर कॉलेजमधून इंटरमिडियट केले. कलकत्ता युनिव्हर्सिटीतुन भौतिकशास्त्र, डॉक्टरकीचा अभ्यास त्यांनी केला. नंतर इंग्लंडच्या ख्रायीस्टचर्च महाविद्यालयातुन भौतिकी, रसायन, वनस्पती शास्त्र आणि निसर्ग शास्त्र यांचा अभ्यास करून ते भारतात परतले.
 
भारतात परतल्यावर कलकत्याच्या प्रेसिडेंटी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापक पदावर रुजू झाले. १८८५ मध्ये या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होणारे ते पहिले भारतीय असल्याने, त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले. पण काही वर्षानंतर त्यांची योग्यता ओळ्खल्यावर, असामान्य शास्त्रज्ञात त्यांची गणना होऊ लागली. १८८५ ते १८९५ या काळात भौतिक शास्त्र शिकवत असताना, त्यांनी विद्युत शक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावून त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती जगभर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोईनकर आणि जे. जे. थॉमसन यांच्या लेखात या शोधाचा उल्लेख आहे. नेमलाईटच्या मदतीने संदेश पाठवण्यातही त्यांना यश आले. विद्युत शक्तीवरील संशोधनानंतर, ते वनस्पतीशास्त्रकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तुंमधील साम्य आणि भेद यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी या विषयावर लिहिलेल्या निबंधांना आणि व्याख्यानांना सुरवातीला व्यपाक मान्यता मात्र मिळाली नाही. १९०१ व १९०४ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीला या विषयावर सादर केलेला निबंध स्वीकारण्यात आले नाही. त्याचे अंशतः कारण म्हणजे, त्यांनी या विषयाचे तत्वज्ञानात्मक विवरण केले होते. तथापि, वनस्पतींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी योजलेल्या वनस्पतींची अतिसूक्ष्म हालचालींची नोंद करणाऱ्या अतिशय संवेदनशील स्वयंचलित उपकरणा बद्दल आणि या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी विविध उद्दीपनांमुळे होणाऱ्या वनस्पतीतील सूक्ष्म बदलाविषयी सातत्याने जमा केलेल्या माहितीबद्दल त्यांची कीर्ती जगभर पसरली.
 
वनस्पतीच्या वाढीचे दहा हजार पट विवर्धन करू शकणारे सेस्कोग्राफ हे स्वयंचलित उपकरण त्यांनी तयार केले होते. या उपकरणाच्या साहाय्याने बोस यांनी वनस्पतींनाही संवेदनग्रहण क्षमता असते, असे प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवले. वनस्पती अन्न ग्रहण करतात, रात्री लवकर झोपतात, सकाळी लवकर उठतात, प्राण्यांप्रमाणे वनस्पतींचाही जन्म विकास आणि मृत्यू होतो. हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले. वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी क्रेस्कोग्राफ, रेझोनंट रेकॉर्डर, असेंलेटिंग रेकॉर्डर, कंपाउंड लेव्हलर, बॅसलिंग अप्रेट्स इत्यादी उपकरणे त्यांनी तयार केली. १९२० साली त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली. १९३६ साली त्यांनी कलकत्त्यात बोस रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. संस्थेने मुखपत्रही सुरू केले. जगदीशचंद्र बोस यांनी इरिटोबॅलिटी ऑफ प्लॅन्टस, इलेक्ट्रोफिजीओलॉजी ऑफ प्लांटस, ट्रॅफिक मूव्हमेंट अँड ग्रोथ ऑफ प्लांटस, द नर्व्हस मेकॅनिझम ऑफ प्लांटस, प्लँटस रिस्पॉन्स १९०६, द फिजिओलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, मोटार मकॅनिजम ऑफ प्लांटस, रिस्पॉन्सेस इन द लिविंग अँड नॉन लिविंग १९०६, लाईफ मूव्हमेंट ऑफ पप्लांटस ( भाग १ ते ४ ) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६ साली सन्मानीय डी. एससी ही पदवी दिली. द रॉयल सोसायटीने १९२० साली त्यांना सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली नाईट हा किताब देऊन गौरविले.
 
जगदीशचंद्र बोस अतिशय देशाभिमानी शास्त्रज्ञ होते. भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी. अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात आणि बोस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी २३ नोव्हेंबर १९३७ रोजी बंगालमधील आता बिहारमधील गिरीडी येथे निधन झाले. जगदीशचंद्र बोस म्हणजे संशोधन, ज्ञाननिष्ठा, प्रयोगशीलता, चिकाटी, दातृत्व व देशभक्तीचा अंतिम शब्द. जगदीशचंद्र बोस यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.