(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळणार आहे. वडिलांनंतर आता मुलगा देखील भारताच्या सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड लवकरच भारताचे ५० वे सरन्यायाधीश (CJI) बनणार आहेत. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश लळीत पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. विद्यमान सरन्यायाधीश हे आपल्या निवृत्तीच्या काही दिवस आधी पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतात.
विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळीत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून ७४ दिवसांचा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड देशाच्या ५० व्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहे.
केंद्र सरकारने सरन्यायाधीश लळीत यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर सरन्यायाधीश लळीत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना जजेस लाउंजमध्ये आमंत्रित करून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची आगामी सरन्यायाधीश म्हणून शिफारस केल्याबद्दल माहिती दिली. तसेच सरकारला पाठवलेल्या पत्राची प्रत त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडे सुपूर्द केली. ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. म्हणून प्रचलित नियमानुसार त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
वडील होते भारताचे १६ वे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड (वाय.व्ही. चंद्रचूड) हे भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते. वाय.व्ही. चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत जवळपास सात वर्षांचा होता. हा आतापर्यंतच्या सरन्यायाधीश पदाचा सर्वात मोठा कार्यकाळ होता. तसेच वडिलांच्या निवृत्तीनंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांचा मुलगा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सरन्यायाधीश होणार आहेत.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.