
Image Source:(Internet)
चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात निर्माणाधीन बोगद्यात पाणी आणि गाळ अचानक शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आत अडकलेल्या ७ मजुरांचा मृत्यू झाला असून १८ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप काही मजूर बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बोगद्याच्या आत सुमारे १.८ किलोमीटर अंतरावर असलेल्या भागातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळाचा प्रवाह आला. काही क्षणांतच बोगद्याचा मोठा भाग गाळाने भरल्याने कामगारांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक मजूर आत अडकले.
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे रात्री काही काळ बचावकार्याला अडथळा निर्माण झाला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा वेगाने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेची दखल घेत बचावकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. बोगद्यात काम करणारे अनेक मजूर छत्तीसगड आणि झारखंडमधील असल्याने संबंधित राज्य सरकारांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
दरम्यान, चमोली परिसरातील बोगदा सुरक्षेचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. त्यामुळे या दुर्घटनेनंतर निर्माणाधीन बोगद्यांमधील कामगारांची सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.