‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेत नवा दावा; शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

    17-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करताना त्यांनी भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळू शकतात, असे संकेत दिले.

माध्यमांशी बोलताना भोंडेकर म्हणाले की, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटाची ताकद वाढत आहे. पक्षाची संघटनात्मक आणि राजकीय ताकद वाढली तर त्याचा परिणाम भविष्यातील सत्तासमीकरणांवरही होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले.

ठाकरे गटातील काही खासदार नाराज असून ते वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनाही त्यांनी दुजोरा दिला. मात्र नेमके किती खासदार संपर्कात आहेत, याबाबत त्यांनी स्पष्ट आकडा सांगण्याचे टाळले. आगामी काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

भोंडेकर यांनी ठाकरे गटातील नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली. पक्षातील लोकांना एकत्र ठेवण्यात अपयश आल्यामुळेच अशा परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. एखादा नेता किंवा लोकप्रतिनिधी स्वतःहून पक्षात येण्याचा निर्णय घेत असेल, तर त्याचे स्वागतच केले जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याच्या आरोपांनाही भोंडेकर यांनी फेटाळून लावले. अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांकडून केवळ राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

विशेष म्हणजे, भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगत, योग्य वेळ आल्यास एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान आलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना आणखी बळ मिळाले असून, आगामी काही दिवसांत घडणाऱ्या हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.