मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा? सायंकाळपर्यंत ‘गोड बातमी’येणार; संजय राठोड यांची माहिती

    30-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वाशिम : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत आज सायंकाळपर्यंत समाधानकारक घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे माध्यमांशी संवाद साधताना राठोड म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने काम करत आहे. उपोषणस्थळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत असून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत आनंददायी आणि दिलासादायक बातमी मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबतही माहिती दिली. या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग पुढील तीन महिन्यांत राज्यभर दौरे करून विविध घटकांची मते आणि सूचना जाणून घेणार असून त्यानंतर आपला अहवाल व शिफारसी राज्य सरकारकडे सादर करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

मराठा आणि बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.