राज्यसभेच्या २६ जागांसाठी रणशिंग; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

    22-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : देशातील १० राज्यांतील राज्यसभेच्या २६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, भारतीय निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विविध राज्यांतील खासदारांचा कार्यकाळ जून-जुलै २०२६ दरम्यान संपत असल्याने ही द्विवार्षिक निवडणूक पार पडणार आहे. मतदान १८ जून २०२६ रोजी होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही पूर्ण केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून ठेवण्यात आली आहे. अर्जांची छाननी ९ जूनला होईल, तर उमेदवारांना ११ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ अशी निश्चित करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया २० जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.

यावेळी कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील प्रत्येकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन, तर झारखंडमध्ये दोन जागांवर मतदान होईल. याशिवाय मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रातही पोटनिवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीमुळे अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांच्यासह अनेक नेते निवृत्त होणार आहेत.

कर्नाटकातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचाही कार्यकाळ संपत आहे. तसेच झारखंडमधून शिबू सोरेन आणि दीपक प्रकाश हे सदस्य राज्यसभेतून बाहेर पडतील.

ईशान्येकडील राज्यांमध्ये मणिपूरचे महाराजा सनाजाओबा लेशेम्बा, अरुणाचल प्रदेशचे नबाम रेबिया आणि मिझोरामचे के. वनलावेना यांचाही कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.