नागपुरात अवकाळी पावसाचा तडाखा; कळमना बाजारात धान्याचे मोठे नुकसान

    02-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेले हजारो क्विंटल धान्य पावसात भिजल्याने नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

विविध भागांतून शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात घेऊन आले होते. मात्र, पावसाच्या अनपेक्षित सरींमुळे धान्य साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्याने ते सुरक्षित ठेवता आले नाही. बाजारात पुरेशा शेडचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान्य उघड्यावरच ठेवावे लागले आणि ते पावसाच्या पाण्यात भिजून गेले.

या घटनेमुळे आधीच वाढलेल्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. आर्थिक अडचणींमध्ये भर पडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या पावसाचा परिणाम शहरातील जनजीवनावरही दिसून आला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला.