
Image Source:(Internet)
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य शासनाने त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून श्रद्धांजलीचा ओघ सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंच्या कल्पनेतील संगीत संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या संकल्पनेला आकार देण्यासाठी शासन आवश्यक ती पावले उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान आशाताईंच्या कार्याचा गौरव करत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांनी संगीत क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र संस्था उभारण्याचा विचार मांडला होता. आता त्यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
आशाताईंनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत हजारो गाणी सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांतील त्यांच्या गाण्यांनी त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले होते, त्यामध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ाचाही समावेश आहे.
त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाने एक महान कलाकार गमावला असला, तरी त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी सदैव जिवंत राहतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.