वीजदरात मोठा दिलासा! महावितरणचा पाच वर्षांचा नवा आराखडा लागू

    11-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महावितरणने सादर केलेल्या २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर प्रस्तावाला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मंजुरी मिळाली असून, या निर्णयामुळे पुढील पाच वर्षांत वीजदरात सातत्याने घट होणार आहे.

या नव्या आराखड्यानुसार घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच प्रकारच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कालावधीत कुठल्याही गटासाठी वीजदर वाढवले जाणार नाहीत, तर दरवर्षी टप्प्याटप्प्याने कमी केले जातील. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक फायदा होणार असून, त्यांच्या बिलात लक्षणीय घट दिसून येईल.

१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांसाठी दर कमी होत जाणार असून, पाच वर्षांत मोठी कपात अपेक्षित आहे. मध्यम वापर गट आणि औद्योगिक ग्राहकांसाठीही दरात घट होणार असल्याने सर्वच स्तरांवरील ग्राहकांना याचा लाभ मिळेल.

उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी ‘टाइम ऑफ डे’ सवलत कायम ठेवण्यात आली आहे. ठराविक वेळेत वीज वापरल्यास मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार असल्याने उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. यामुळे उद्योगांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या या निर्णयामागे सौरऊर्जेचा वाढता वापर आणि ऊर्जा व्यवस्थापनातील सुधारणा हे प्रमुख घटक मानले जात आहेत. एकूणच, पुढील पाच वर्षांत वीजदरात होणारी घट ही राज्यातील ग्राहकांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे.