
Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना लाडकी बहीण योजना ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या योजनेसाठी आवश्यक ती भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण’ योजना ही सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे अर्थसंकल्पात या योजनेबाबत काय निर्णय होणार याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले होते.
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ८ मार्चच्या जागतिक महिला दिवस निमित्त राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुमच्या मनातील एक-एक गोष्ट आम्ही पूर्ण करत आहोत,” असे ते म्हणाले. तसेच या योजनेविरोधात न्यायालयात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना हप्ते मिळाले नव्हते. काही लाभार्थी महिलांचे तीन महिन्यांचे हप्तेही प्रलंबित होते. मात्र आता सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात करण्यात आली असून काही महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. उर्वरित महिलांच्या खात्यातही पुढील एक-दोन दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
अनेक महिला पात्र असूनही केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांसाठी ही योजना पुढेही कायम ठेवण्यात येणार आहे.