जादूटोण्याने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर... ; खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा टोला

    25-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या कथित गैरकृत्यांचे धक्कादायक तपशील समोर येत असताना राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धेविरोधात ठाम भूमिका घेत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसट झाली की समाजाचा विवेक हरवतो, असे स्पष्ट केले.

खरातविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळापर्यंत जाण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उपरोधिक भाषेत खरात प्रकरणाचा उल्लेख केला. जादूटोण्याने समस्या सुटल्या असत्या तर अशोक खरातला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर सल्लागार म्हणून नेमले असते, असे म्हणत त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या मानसिकतेवर निशाणा साधला. निवडणुका जिंकण्यासाठी प्रचारसभांची गरजच भासली नसती, असेही त्यांनी टोमणेखोरपणे नमूद केले.

महाराष्ट्राची संतपरंपरा आणि समाजसुधारकांची परंपरा अधोरेखित करत, या भूमीत अंधश्रद्धेला कधीच स्थान नव्हते आणि भविष्यातही मिळणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत असून अनेक धक्कादायक बाबी तपासातून पुढे येत आहेत. नागरिकांनी यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास ती शासनाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अशोक खरात याची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारी, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. राज्यभरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.