मध्यपूर्वेतील युद्धामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात; पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    24-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, भारत नेहमीच संवादावर भर देतो आणि सर्व संबंधित देशांशी संपर्क ठेवत आहे.

मोदी म्हणाले की, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते आणि त्याचे निराकरण संवादातूनच शक्य आहे. भारत सर्व देशांना शांततामय उपाय शोधण्यास प्रोत्साहित करत आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेवरही भर दिला. शिपबिल्डिंग, रेअर अर्थ मिनरल्ससह विविध क्षेत्रांत भारत जास्त अवलंबित्व टाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी सांगितले की, युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेळ लागेल.

मोदी म्हणाले की, संकटे देशाच्या धैर्याची आणि प्रयत्नांची कसोटी घेतात. मागील ११ वर्षांत भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.

पंतप्रधानांनी सिव्हिल पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे भारतावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष ठेवण्याचे सांगितले. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी खुला राहावा यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.