Image Source:(Internet)
मुंबई:
२८ जानेवारी रोजी घडलेल्या उपमुख्यमंत्री अजित (Ajit) पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी राजकीय वर्तुळात संशयाचे सावट गडद होत आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट जमिनीवर आदळले आणि स्फोटासह भीषण आग लागल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच अपघाताच्या कारणांवर आणि तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अद्याप एफआयआर नोंदवला न गेल्यामुळे त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती.
राज ठाकरेंची भेट, संशय अधिक गडद-
दरम्यान, रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी व स्वतःच्या शंका राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी थेट सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“मध्यंतरी मी कुणाशी तरी बोललो की हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने, हे महाराष्ट्राला समजत नाहीये. रोहित पवारांनी काही टेक्निकल गोष्टी सांगितल्या. त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला, पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला गेला नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
‘ब्लॅक बॉक्स’वरही प्रश्न-
काही दिवसांपूर्वी विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती. यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी म्हटले, “कितीही विमान जळालं तरी ब्लॅक बॉक्स जळत नसतो. मग इथे नेमकं काय झालं? सरकार या सर्वामागे संशयाची भूतं नाचवत आहे. यामागे नेमकं राजकारण काय आहे, हे समजत नाही.”
राजकीय वातावरण तापले-
या वक्तव्यांनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. अपघाताच्या कारणांबाबत अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नसताना विरोधकांकडून सातत्याने पारदर्शक तपासाची मागणी केली जात आहे.
दरम्यान, सरकारकडून या आरोपांवर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजितदादांच्या विमान दुर्घटनेमागील सत्य नेमके काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.