Image Source:(Internet)
नागपूर :
भाजपचे अनुभवी आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केल्यानंतर नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे भाजपमधील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये असंतोषाची लाट उसळली असून, अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
जोशी यांच्या घोषणेनंतर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाबाहेर जमले. घोषणाबाजी करत त्यांनी संदीप जोशी यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी केली. परिस्थिती पाहता परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संदीप जोशी यांनी सोमवारी पहाटे एक निवेदन प्रसिद्ध करून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर समाजसेवेचे साधन असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले. नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळावी, या उद्देशाने आपण हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वयाच्या ५५व्या वर्षी त्यांनी आपल्या सक्रिय राजकीय वाटचालीला थांबा देण्याचा निर्धार केला आहे.
जोशी यांनी सांगितले की, त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असून तोपर्यंत ते सर्व घटनात्मक जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडतील. मात्र त्यानंतर कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. समाजसेवक म्हणून जनतेसाठी काम करणे आणि युवकांना प्रेरणा देणे हे कार्य सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या पत्रात त्यांनी भाजप नेतृत्वासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, “कुर्सीपेक्षा मूल्य महत्त्वाचे,” असा संदेश दिला.
दरम्यान, जोशी यांच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले आणि निर्णय बदलण्याची मागणी लावून धरली. जोशी यांनी स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले.
अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन संदीप जोशी यांनी आपला निर्णय २५ जानेवारीपर्यंत तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.