माझं घर पाडलं...;मुंबई निकालानंतर कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    17-Jan-2026
Total Views |
 
Kangana Ranaut attacks Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. ठाकरे (Thackeray) कुटुंबाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईवर आता महायुतीने निर्णायक वर्चस्व मिळवले असून भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचा महापौर विराजमान होणार आहे.
 
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. “ज्यांनी माझं घर तोडलं, त्यांना जनतेनेच सत्तेपासून दूर केलं,” अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली.
‘हा निकाल म्हणजे माझ्यासाठी न्याय’
 
मुंबई महापालिकेच्या निकालावर बोलताना कंगनाने २०२० मधील बीएमसी कारवाईचा संदर्भ दिला. “ज्यांनी मला अपमानित केलं, माझं कार्यालय पाडलं आणि मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, आज त्याच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही; निसर्ग स्वतः न्याय करतो,” असे ती म्हणाली.
 
नेपोटिझम आणि माफियावर घणाघाती आरोप
कंगनाने ठाकरे गटावर महिलांविरोधी भूमिका आणि नेपोटिझम माफियाला संरक्षण दिल्याचा आरोप केला. “जनतेने अशा प्रवृत्तींची जागा दाखवून दिली, याचा मला अभिमान आहे,” असे म्हणत तिने या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. मुंबईत ‘भगव्या परिवर्तनाची’ सुरुवात झाल्याचेही तिने नमूद केले.
 
जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत
दरम्यान, कंगनाचा २०२० मधील एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. बीएमसी कारवाईनंतर तिने उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले होते, “आज माझं घर तुटलंय, पण उद्या तुमचा अहंकार मोडेल.” आजच्या निवडणूक निकालानंतर तिचे ते शब्द खरे ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.