(Image Source-Internet)
अमरावती:
आज सकाळी मेळघाट (Melghat) परिसरात बारू व बिजुधावडी दरम्यान असलेले बारू धरण अज्ञात कारणांमुळे फुटले. या धरणाच्या फुटण्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर आले असून, त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
धरण फुटल्यानंतर रस्त्यावर पाण्याचा वेग प्रचंड होता, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव आणि पुनर्बांधणी कार्य सुरू आहे. दरम्यान, धरण फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्थानिक नागरिकांनी धरणाच्या देखभालीमध्ये झालेल्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.