शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाही; नुकसानभरपाईचे नवे निकष ठरवण्याचा सरकारचा विचार

    27-Sep-2025
Total Views |

Loan waiver
 Image Source:(Internet) 
मुंबई :
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची (Loan waiver) मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकारकडून थेट कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शासन नुकसानभरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यावर भर दिला जाणार आहे. परंतु थेट कर्जमाफीचा निर्णय सरकारच्या अजेंड्यावर नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात जवळपास ७० लाख एकर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. ‘ओला दुष्काळ’ घोषित करून तातडीची कर्जमाफी करावी, अशी मागणी होत असली तरी, सध्या तरी सरकार नुकसानभरपाईच्या नव्या धोरणावर भर देणार असल्याचे दिसून येते.