नवीन नागपूर प्रकल्पात शेतकऱ्यांना नियमांनुसार मोबदला मिळणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास

    15-Sep-2025
Total Views |

Chandrashekhar Bawankule
(Image Source-Internet)
नागपूर:
राज्य सरकार नवीन नागपूर शहर उभारताना सर्व संबंधित घटकांचा विचार करत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक नुकसान होणार नाही. त्यांच्या जमिनीचे भूसंपादन कायद्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जाईल.”
 
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काही लोकांमध्ये प्रकल्पाबाबत गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण प्रत्यक्ष जमीन संपादन सुरू झाल्यावर शेतकऱ्यांशी थेट चर्चा होईल आणि त्यांना नियमांनुसार मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांनी म्हटले, “प्रत्येक समाज आपल्या हक्कांसाठी मागणी करतो. आरक्षणाच्या नियमांनुसारच कोणत्याही समाजाला स्थान मिळू शकते. केंद्र सरकारकडे योग्य प्रस्ताव पाठवल्यावरच निर्णय घेतला जाईल. बंजारा आरक्षणाची मागणी आल्यावर त्यावर चर्चा होईल.”
 
शेतकऱ्यांच्या पिकांतील नुकसान भरपाईसाठी प्रशासन सज्ज आहे. नुकसान झालेल्या पिकांसाठी नियमानुसार भरपाई केली जाईल, आणि त्यासाठी पंचनामा प्रक्रिया सुरू आहे, असे बावनकुळे म्हणाले.
 
राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “उद्धव ठाकरेंचा सध्याचा तोल कमी झाला आहे. काँग्रेसने त्यांना सोडले आहे आणि महाविकास आघाडीतील काही नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांसाठी केलेल्या खेळाला यश आलेले नाही, आणि ते निराशेने वक्तव्य करत आहेत.”